दुबळी माझी झोळी...
प्रत्येकाच्या मनात आपल्या माणसांच्या साठी एक हळवा कोपरा असतो. आपल्या माणसाच्या आठवणी आपल्या मनाच्या कुपी मध्ये कशा जतन करायच्या याची प्रत्येकाची एक पद्धत असते. कुणी त्यांच्या आवडीचा एखादा पदार्थ वर्षभरासाठी सोडून देतात, कुणी त्यांचे फोटो लावतात, कुणी त्यांचे दागिने किंवा त्यांच्या वापरातल्या इतर कोणत्या गोष्टी जपून ठेवतात, कुणी त्यांच्या नावे देणगी देतात, कुणी त्यांच्या आठवणी कागदावर उतरवतात. माझ्या मनात जेव्हा आईचा विचार येतो तेव्हा या सगळ्या गोष्टी फार तोकड्या वाटतात. आई जाताना एव्हढा मोठा वारसा मागे सोडून गेली आहे की त्याच जतन कसं करता येईल हा विचार मनात डोकावतो. "घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे" हाच एक मार्ग दिसतो. जर हा वारसा जपायचा असेल तर आपल्या मनाला भावतील आणि आपल्याला शक्य होतील त्या गोष्टी आपल्या अंगी बाणवायला हव्या. आई फार श्रद्धाळू होती. रोज दारात शुभ चिन्हांनी युक्त रांगोळी असायची. दारात चपलांचा स्टँड आल्यानंतर तिने देवघरासमोर काळ्या ग्रॅनाईटवर रांगोळी काढायची. रोज संध्याकाळी देवासमोर दिवा न चुकता लावायची. व्रत वैकल्यांवर तिचा विश्व...